एक ४-५ वर्षाचा मुलगा रोज जेवताना आणि झोपताना त्याच्या काकांकडे गोष्ट सांगण्यासाठी हट्ट धरायचा. आणि गोष्ट सुद्धा शिवाजी महाराजांचीच; इतर कुठल्याही गोष्टीने काम भागत नसे. काकासुद्धा लाडक्या पुतण्याचा हट्ट अगदी हौसेने पुरवत. चार भावंडांमधे वडील सगळ्यात धाकटे असल्याने मोठे काका या मुलाला आजोबांप्रमाणेच वाटत; प्रसंगी दरारा पण इतरवेळी तोच मायेचा ओलावा आणि निर्व्याज्य प्रेम.काकांनी सांगितलेल्या गोष्टीं मधले लाखभर फौजेत घुसून शास्ताखानाची बोटे छाटणारे महाराज आणि त्यांचे सरदार म्हणजेच तान्हाजी, येसाजी, बाजी, नेतोजी हे सर्व त्या मुलाला एखाद्या सुपरहिरो प्रमाणे भासत असत.
वर उल्लेख केलेला हा ४-५ वर्षाचा मुलगा दूसरा-तिसरा कोणी नसून मीच आहे. लहानपणी काका ंच्या गोष्टीं मधून महाराजांची ओळख झाल्यानंतर येणाऱ्या काळात विविध माध्यमातून महाराज भेटत गेले. चौका-चौकात साजरी होणारी शिवजयंती असेल, वेगवेगळ्या सामाजिक-राजकीय मंचावरुन होणारा महाराजांचा उल्लेख असेल, 'जाणता राजा" सारखे महानाट्य असेल किंवा विवध इतिहासकारांची व्याख्याने असतील यांसर्वांतुन महाराज कानावर पडत होते. नगरच्या जिल्हावाचनलयातील विविध पुस्तकांमधून वाचनातही येत होते. यासर्वांमधून खरे महाराज कोणते हे ठरवण्याची बुद्धी महाराजच देत गेले.
पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आल्यानंतर माझ्या बहिणीची मुले व आपल्या NEOMM परिवारातील मुले-मुली यांच्या माध्यमातून अमेरिकेतील मुले व त्यांच्या शालेय जीवनाशी जवळचा संबंध आला. मला ज्या वयात महाराजांबद्दल प्रचंड कुतुहल व अधिकाधीक माहिती जाणून घेण्याची ओढ वाटायची, त्याच वयातील या मुलांना महाराजांबद्दल फारशी माहिती नव्हती. आणि ते स्वाभाविकही होते. मुलांवरील संस्कार जसे घरातून होतात तसे ते समाजातूनही होतात. माझ्यासारख्या महाराष्ट्रात वाढलेल्या मुलांना जे सामाजिक वातावरण मिळाले तसे या मुलांना इथे मिळणे शक्य नव्हते. आणि पालकांकडूनही रोजच्या धावपळीत ही गोष्ट राहून जात होती.
परंतु, ज्यांच्या शौर्याचे, व्यवस्थापन कौशल्याचे आणि इतरही अनेक गुणांचे दाखले फक्त स्वदेशी इतिहासकारच नाही तर परदेशी आणि शत्रूपक्षातील इतिहासकारांनीही दिले आहेत, अश्या आपल्या महाराजांबद्दल मुलांना माहिती होणे गरजेचे होते.
यातूनच आपल्या NEOMM परिवारातील मुलामुलींसाठी शिवजयंतीच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना माझ्या मनात आली. NEOMM २०२६ च्या कार्यकारणीतील सर्वांना ही कल्पना आवडली. या स्पर्धेचा मुख्य हेतु मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ओळख व माहिती व्हावी हा असल्याने मुलांवर बोलताना कुठलेही भाषेचे बंधन न घालण्याचे निश्चित करण्यात आले.
स्पर्धा तिथीनुसार शिवजयंतीच्या दिवशी घेण्याचे ठरले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मुलांचा व त्याच बरोबर पालकांचा सहभाग देखील महत्वाचा होता. आणि तो मिळाला सुद्धा. सर्व पालकांनी मुलांकडून स्पर्धेची उत्तम तयारी करून घेतली होती. सर्वच स्पर्धकाची भाषणे छान झाली. शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगताना पारंपारिक वेशभुषेतील मुले खुपच गोंडस दिसत होती.
स्पर्धेसोबतच इतर कार्यक्रमांचे व्यस्त वेळापत्रक असूनही मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे स्पर्धेसाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
आपल्या NEOMM परिवारातील तन्मयी दीक्षित, श्रीकांत लिमये आणि नितीन सामंत यांनी मंडळाच्या विनंतीला मान देऊन स्पर्धेचे परीक्षक म्हणून कामं पहिले. त्याबद्दल मंडळाच्यावतीने मी त्यांचे आभार मानू इच्छितो.
आपण सर्वजण हे जाणतो की आपण आज जे काही आहोत, आपण आपल्या पद्धतीने आपली संस्कृती जोपासू शकत आहोत, आपले सण-वार साजरे करू शकत आहोत ते सर्व छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. या स्पर्धेनिमित्त वाचण्यात, ऐकण्यात आलेले शिवाजी महाराज मुलांच्या कायम लक्षात राहतील ; आणि येणाऱ्या काळात महाराजांबद्दल आधिकची माहिती मिळवण्यासाठी ही स्पर्धा मुलांना प्रेरित करीत राहील अशी आशा आहे.
वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धकांची काही क्षणचित्रे -










स्पर्धेचा निकाल -
१. वयोगट- ५ ते ७ वर्ष
विजेता - विहान गवळी
उपविजेती - आरध्या पाटील
२. वयोगट - ८ ते ११ वर्ष
विजेते - आभा कोळवणकर पाटील आणि सानवी मइंडळकर(विभागून)
उपविजेती - निर्वि अत्तरडे
श्री. चैतन्य मुंगी

